विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवा   

कर्नाटक भाजपची मागणी 

बंगळुरु : चिन्नास्वामी स्टेडियमबाहेरील चेंगराचेंगरीच्या घटनेवर चर्चा करण्यासाठी सरकारने विधिमंडळाचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावावे, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी रविवारी केली.चेंगराचेंगरीतील मृतांच्या वारसांसाठी पक्षाचे सर्व आमदार एक महिन्याचे वेतन देणार असल्याचेही ते म्हणाले. राज्यातील सरकार दिवाळखोर नसेल तर भरपाईपोटी एक कोटी मृतांच्या वारसांना द्यावे, अशी मागणीदेखील केली.
 
आयपीएल विजेत्या रॉयल चॅलेंजर्स बगळुरूचा (आरसीबी) विजयोत्सव साजरा करण्यासाठी ४ जून रोजी चिन्नास्वामी स्टेडियमवर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आवडत्या खेळाडूची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी हजारोंच्या संख्येने गर्दी केली होती. त्यातून उद्भवलेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांना प्राण गमवावे लागले. तर, ५० हून अधिक जण जखमी झाले. या घटनेनंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपने केली होती. चेंगराचेंगरीच्या घटनेस जबाबदार कोण? नेमकी चूक कोणाची होती? असा सवाल जनतेकडून केला जात आहे. 
 

Related Articles